फोटो – माय खेल

टीम इंडियाच्या (Team India) फॅन्सनी कधीही कल्पना केली नसेल इतका खराब खेळ भारतीय बॅट्समन्सनी अ‍ॅडलेड टेस्टच्या (Adelaide Test) तिसऱ्या दिवशी करुन दाखवला!  या टेस्टमध्ये बहुतेक काळ वर्चस्व गाजवल्यानंतर फक्त एकाच सेशनमध्ये अगदी स्पेसिफिक सांगायचं तर एका तासात भारताने ही मॅच गमावली. नुसती हरली नाही तर लाज जावी इतक्या वाईट पद्धतीनं हरली. लॉर्ड्स 2017,  ओल्ड ट्रॅफर्ड 2019  मध्ये दोनदा थोबाडीत बसल्यानंतरही भारतीय बॅट्समन्स शिकलेच नाहीत. त्यामुळेच ते अ‍ॅडलेडमध्ये अगदी तळाशी गेले. टीम इंडियाचा ‘काळा शनिवार’ अशी या दिवसाची इतिहासात नोंद झाली आहे.

… पाहता-पाहता कोसळले!

टेस्ट रँकिंगमध्ये सध्या नंबर 1 वर असलेल्या पॅट कमिन्सनं (Pat Cummins) टीम इंडियाच्या वस्त्रहरणाची सुरुवात केली. त्याने नाईट वॉचमन म्हणून आलेल्या जसप्रीत बुमराहला आऊट केले. त्यानंतर भारतीय बॅट्समन ज्या पद्धतीनं आऊट झाले ते पाहता नाईट वॉचमन कोण होतं आणि प्रमुख बॅट्समन कोण? यातील फरक समजलाच नाही.

पॅट कमिन्सनं ऑस्ट्रेलियाला नेहमी त्रासदायक ठरणाऱ्या चेतेश्वर पुजाराला शून्यावर आऊट करत बॅटिंग सोपी नसल्याचा इशारा दिला. पुजारा ही भारतीय बॅटिंगची ढाल आहे. ढाल खाली पडल्यावर संपूर्ण शरीरावर सपासप वार झाले. मिचेल स्टार्कच्या जागी बॉलिंगला आलेल्या जोश हेजलवुडने (Josh Hazlewood) पहिल्याच ओव्हरमध्ये दोन वार केले. त्याने मयांक अग्रवाल आणि अजिंक्य राहणेला आऊट केले. भारत 4 आऊट 15.

( वाचा : अस्सल पाकिस्तानी रिटायरमेंटची ‘आमिर’ कथा! )

‘विराट’ संधी गमावली!

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli)  एका बाजूने ही सर्व पडझड पाहत होता. विराटकडे या संकटातून टीम इंडियाला बाहेर काढण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. कपिल देवनं (Kapil Dev) 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध जवळपास अशाच परिस्थितीमधून टीमला बाहेर काढले होते. सौरव गांगुलीनं 17 वर्षांपूर्वी ब्रिस्बेनमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये एक अविस्मरणीय सेंच्युरी करत सीरिजची दिशा स्पष्ट केली होती. ‘सुपर व्ही’ असं ज्याचं ब्रँडींग सतत केलं जातं त्या विराटला कपिल किंवा गांगुलीसारखी ‘कॅप्टन्स नॉक’ खेळता आली नाही. समोर विकेट जात असल्याचं पाहून तो कदाचित विचलित झाला असावा. त्याने पहिल्या इनिंगमध्ये एकदाही न खेळलेला शॉट खेळला. पॅट कमिन्सला कव्हर ड्राईव्ह मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. कोहली 4 रनवर आऊट झाला. भारत 6 आऊट 19.

(वाचा : संपूर्ण सीरिजची दिशा ठरवणारे सौरव गांगुलीचे 144 रन्स! )

विराट गेल्यानंतर मैदानात खेळणाऱ्या भारतीय टीमप्रमाणेच घरोघरी मॅच पाहणाऱ्या भारतीय फॅन्सचे चेहरे आणि खांदे दोन्ही पडले होते. अ‍ॅडलेड टेस्ट जिंकण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या. त्या आशा कधीही पल्लवीत होणार नाहीत याची काळजी भारताच्या उरलेल्या बॅट्समन्सनी घेतली.

अजब योगायोग

भारताच्या एकाही बॅट्समनला दोन अंकी रन करता आले नाहीत. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात हे 1924 नंतर हे फक्त दुसऱ्यांदा घडले आहे. चार वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 19 डिसेंबर 2016 रोजी टीम इंडियाने 7 आऊट 749 असा आपला टेस्ट क्रिकेटमधला सर्वोच्च स्कोअर केला होता. चार वर्षांनी त्याच दिवशी निचांकी स्कोअर देखील नोंदवला.

टीम इंडियाने हे अगदी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) सारखं केले आहे. आरसीबीने 23 एप्रिल 2013 या दिवशी 5 आऊट 243 असा आयपीएल इतिहासातील सर्वोच्च स्कोअर केला होता. त्यानंतर चार वर्षांनी 2017 साली त्याच तारखेला आरसीबीची टीम 49 रन्सवर ऑल आऊट झाली. आयपीएल इतिहासातील ती आजवरची निचांकी धावसंख्या आहे.

या दोन्ही योगायोगांमध्ये दडलेला तिसरा योगायोग असा आहे की या चारही प्रसंगात टीम इंडिया आणि आरसीबी या दोन्ही टीमचा कॅप्टन विराट कोहली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading